
प्रतिनिधी । नातेपुते
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच नातेपुते येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने बँकेचे अध्यक्ष आदरणीय गिरीशजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जपणूक करत बँकेने वारकरी भाविक तसेच वारी व्यवस्थापनात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा उपक्रमांचे आयोजन केले होते.
या उपक्रमांतर्गत हजारो वारकरी भाविकांना अखंड हरिपाठ पुस्तिकांचे वाटप तसेच फराळाचे वितरण करण्यात आले. वारीच्या सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पावसापासून संरक्षणासाठी उत्कृष्ट दर्जाचे रेनकोट भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे वारकरी आणि पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले.
यावर्षी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एटीएम व्हॅन देखील नातेपुते ते पंढरपूर या वारी मार्गावर सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी भाविकांना प्रवासादरम्यान सहजपणे रोख रक्कम व बँकिंग सुविधा उपलब्ध होत असून या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर लाभ वारकऱ्यांना होत आहे.
या सेवाभावी उपक्रमात महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परिसरातील जवळपास सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच क्षेत्रीय कार्यालय, सोलापूर येथील क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. किशोर मुसळे यांच्या नेतृत्वाखाली क्षेत्रीय कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्थित होते.
बारड ते नातेपुते या वारी मार्गावर त्यांनी वारकऱ्यांसमवेत पदयात्रेत सहभागी होत सेवाभावाचा संदेश दिला. यावेळी बोलताना बँकेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून सेवा, समर्पण आणि समाजाशी नाते दृढ करणारा महोत्सव आहे. या पवित्र सोहळ्यात वारकरी भाविकांच्या सेवेसाठी योगदान देता येणे ही महाराष्ट्र ग्रामीण बँकेसाठी अभिमानाची बाब आहे.