सब हेड । जिल्ह्यातील सर्व अधिकारी वारकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील, गोरे यांनी केली वाखरी पालखी तळाची पाहणी
प्रतिनिधी । सोलापूर
पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी आहे. त्यामुळे वारकऱ्यांना व्हीआयपी समजूनच सेवासुविधा पुरवल्या जात आहेत. म्हणूनच इतर कोणत्याही व्हीआयपींना विठ्ठल मंदिरात थेट दर्शन दिले जाणार नाही. वारकऱ्यांना सहज आणि सुलभ दर्शन मिळावे, यासाठीच आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, “पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करावे. तसेच वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरी नगरी सजवण्यात यावी. यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले असून स्वागत कमानींसह विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आषाढीच्या निमित्ताने येणाऱ्या कोणत्याही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास त्यांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन किंवा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना फोन करावा. जिल्ह्यातील अधिकारी आणि पालकमंत्री वारकऱ्यांच्या सेवेसाठी टोल फ्री क्रमांकाप्रमाणे काम करतील आणि वारकऱ्यांच्या अडचणी सोडवतील,” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*वाखरी पालखी तळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी*
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा २५ जुलै २०२६ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांसह इतर संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. नवमी दिवशी वाखरी येथे अनेक पालख्यांचा मुक्काम असतो. त्यामुळे वाखरी पालखी तळावर मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे वाखरी पालखी तळावर काही ठिकाणी पाणी साचले होते. तळावर पाणी साचलेल्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी सिमेंट पाईप टाकावेत, मुरमीकरण करून पाण्याला उतार करावा, कोठेही खड्डे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. वारकरी भाविकांच्या सुविधेबाबत कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व यंत्रणांनी नेमून दिलेली कामे पूर्ण करावीत. सुविधांसाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास तो जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभिजित औटी, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.