
प्रतिनिधी । सोलापूर
आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीने प्रसादाची मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ११ लाख बुंदी लाडू प्रसाद आणि ७५ हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्यात आला आहे. बुंदी लाडूंची निर्मिती मंदिर समितीच्या उत्पादन केंद्रात होत असून, राजगिरा लाडू आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात आले आहेत.
भाविकांसाठी ७० ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू २० रुपयांना, तर २५ ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू १० रुपयांना उपलब्ध आहेत. प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार आणि संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे २४ तास सुरू ठेवण्यात आली आहेत.
एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा रिफाइंड तेल, काजू, बेदाणे आणि वेलची यांसारख्या दर्जेदार साहित्याचा वापर करून लाडू तयार केले जात आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले असून, शासकीय प्रयोगशाळेनेही हा प्रसाद खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित केले आहे.
प्रसाद व्यवस्थापनाची जबाबदारी विभाग प्रमुख संजय कोकीळ यांच्याकडे असून, सुमारे ११० कर्मचारी आणि स्वयंसेवक २४ तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत असल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली आहे.