
सब हेड । ‘मिशन सुधार’अंतर्गत ७१ हजार ९५६ लाभार्थी रेशन यादीतून वगळले
माळशिरस, माढ्यात सर्वाधिक संशयास्पद लाभार्थी
सोलापूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बोगस व अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७१ हजार ९५६ संशयास्पद व अपात्र लाभार्थी रेशन यादीतून वगळण्यात आले आहेत. आधार डेटाबेस, ई-केवायसी आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पुरवठा विभागाने ११ तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची माहिती तपासली. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले, प्राप्तिकर भरणारे, चारचाकी वाहनधारक, कंपनी किंवा विविध मंडळांचे संचालक, तसेच मयत, दुबार नोंदणी झालेले आणि दीर्घकाळ धान्य न उचलणारे लाभार्थी या तपासणीत आढळून आले.
तालुकानिहाय पाहता माळशिरस येथे सर्वाधिक १० हजार ८७७, माढा १० हजार १५३, बार्शी ९ हजार १६, पंढरपूर ८ हजार १८०, अक्कलकोट ६ हजार १८७, सांगोला ६ हजार ३३ आणि दक्षिण सोलापूरमध्ये ५ हजार ८५८ संशयास्पद लाभार्थी आढळले. करमाळा व मंगळवेढा प्रत्येकी ४ हजार ७९४, मोहोळ ३ हजार ५९३, तर उत्तर सोलापूरमध्ये १ हजार ९२२ लाभार्थींचा समावेश आहे.
वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले ४१ हजार ३१२, दीर्घकाळ धान्य न उचलणारे १३ हजार ९२६, बोगस ५ हजार ४, आधार स्टेटसमध्ये त्रुटी असलेले ३ हजार ९८०, कंपनी संचालक ३ हजार ९७ आणि मोठी वार्षिक उलाढाल असलेले २ हजार ८९१ लाभार्थी आहेत. याशिवाय १०० वर्षांहून अधिक वयाचे १ हजार ७६ आणि चारचाकी वाहनधारक ४७३ लाभार्थीही आढळले.
दरम्यान, पात्र लाभार्थी रेशनच्या धान्यापासून वंचित राहू नयेत, याची काळजी घेतली जात असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. नजरचुकीने नाव वगळले असल्यास ते पुन्हा यादीत समाविष्ट केले जात आहे. निर्धारित उत्पन्न मर्यादा ओलांडलेल्या लाभार्थ्यांनी स्वतःहून नाव वगळून घेण्यासाठी पुरवठा विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे यांनी केले आहे.