
प्रतिनिधी । सोलापूर
साखरेच्या वाढत्या दरांना आळा घालण्यासाठी तसेच बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने तपासणी मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी पुरवठा विभागाच्या पथकाने शहरातील विविध किरकोळ व घाऊक दुकानांवर अचानक धाड टाकून साखरेच्या साठ्याची पाहणी केली.
गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होत आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून साखरेची बेकायदेशीर साठेबाजी किंवा काळाबाजार केला जात आहे का, याची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे.
नियमानुसार व्यापारी आणि मोठ्या रिटेल विक्रेत्यांना त्यांच्या आवश्यकतेच्या केवळ ५० टक्के साखरेचा साठा ठेवण्यास परवानगी आहे. या नियमाचे पालन होत आहे का, तसेच दुकानांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे का, याची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली.
पुरवठा विभागाच्या अचानक झालेल्या कारवाईमुळे साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या मोहिमेमुळे अनधिकृत साठेबाजीला आळा बसून बाजारातील साखरेचे दर नियंत्रणात येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
