
प्रतिनिधी । सोलापूर
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात प्रभावी वक्तृत्वकला, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या व्यापक उद्देशाने रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटतर्फे आंतरशालेय मराठी वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. लहान व मोठ्या गटातील तब्बल ६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्वाची प्रभावी छाप उमटवली.
स्पर्धेची सुरुवातही विशेष ठरली. शाळेतील आठवणी जागवणाऱ्या घंटानादाने स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि संपूर्ण वातावरणात उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले.
‘प्लास्टिकमुक्ती’, ‘प्रत्येक मुलाने शाळेत जायलाच हवे’, ‘एक विद्यार्थी – एक झाड’, ‘वाचन संस्कृतीचे महत्त्व’, ‘जलसंधारण – भविष्याची हमी’, ‘स्वच्छता आणि आरोग्य’, ‘आजचा विद्यार्थी – उद्याचा जबाबदार नागरिक’ आणि ‘वृक्षसंवर्धन – सामाजिक जबाबदारी’ अशा वर्तमानाशी निगडित आणि सामाजिक भान जागविणाऱ्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
वयाच्या मानाने विषयांचे गांभीर्य समजून घेत विद्यार्थ्यांनी मुद्देसूद मांडणी, ओघवती भाषा, योग्य शब्दफेक, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरण यांचा सुरेख मिलाफ साधत आपले मनोगत निर्धारित वेळेत व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांच्या भाषणातून पर्यावरण, शिक्षण, स्वच्छता, वाचन आणि सामाजिक जबाबदारी यांविषयीची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवली.
गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव
लहान गट :
प्रथम – शौर्य रंगापुरे
द्वितीय – शुभदा कुलकर्णी
तृतीय – मधुरा घाडगे
उत्तेजनार्थ – ओवी तडवळकर
मोठा गट :
प्रथम – दूर्वा महिंद्रकर द्वितीय – श्रुती स्वामी तृतीय – अवनी सामल
उत्तेजनार्थ – सई वाघचवरे या विद्यार्थ्यांचा रोटरी ई क्लब इलाईटचे पदाधिकारी संदीप कुलकर्णी अध्यक्ष, सेक्रेटरी डॉ. सौरभ ढोपरे, सचिन तोष्णीवाल,मनिष लोया, अभिजित छत्रबंद, आणि परीक्षकांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील अभिमान आणि शिक्षकांच्या कौतुकाच्या भावना या पारितोषिक वितरण सोहळ्याला विशेष भावनिक उंची देऊन गेल्या.
या स्पर्धेचे परीक्षण मराठी भाषेचे अभ्यासक व साहित्यप्रेमी केदार केसकर आणि संध्या रघोजी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भाषाशैलीबरोबरच विषयाची समज, आशयाची मांडणी, वक्तृत्वातील आत्मविश्वास, सादरीकरण आणि वेळेचे भान या विविध निकषांवर स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेसाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाईटच्या शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला.

“आजचा आत्मविश्वासपूर्ण वक्ता म्हणजे उद्याचा सक्षम आणि जबाबदार नागरिक” या विचाराची प्रचिती देणाऱ्या या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच नवी दिशा मिळाली.
