
प्रतिनिधी । सोलापूर
‘फडणवीसांचे डाव संपले; आता माझा डाव सुरू होईल’
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल; २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलनाची हाक
सोलापूर : “सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोलापुरात दिला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर सरकारवर टीका करत काही कागदोपत्री पुरावेही सादर केले. “एकाची व्हॅलिडिटी होते आणि दुसऱ्याची रद्द कशी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुप्त पत्राद्वारे मराठ्यांच्या कुणबी नोंदी व प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश दिल्याचा आरोप जरांगे यांनी केला. “फडणवीसांच्या सांगण्यावरून आणि बावनकुळेंच्या माध्यमातून हे सर्व सुरू आहे. शिंदे समितीने मूळ नोंदी शोधून काढल्या असताना त्या रद्द कशा केल्या जात आहेत? मराठ्यांच्या लेकराबाळांचे वाटोळे करण्याचा हा डाव उधळून लावू,” असे ते म्हणाले. तसेच आपल्यावर हल्ला किंवा अटकेचा डाव आखण्यात आल्याची माहिती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मराठा समाजाने अंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. “मराठ्यांच्या लेकरांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आपण गप्प बसायचे नाही,” असे ते म्हणाले. यावेळी मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.